आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं…

Change

शुभ्र दही पाहिलं…की तोंडाला पाणी सुटतं,
खायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार,
थोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं!

पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर ?
At the end of the day,
ते आंबट होऊन जाईल.

अजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल.
मग उपयोग काय त्या perfectly set झालेल्या दह्याचा ?

मनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं… नाही का ?

दह्यासारखं ‘set’ झालेलं आयुष्य नक्कीच आवडेल !
पण ते आयुष्य तसंच set राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल.
सपक होईल….. वायाच जाणार ते.

त्यापेक्षा रोजच्या रोज, आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.
आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच! आयुष्य जगायला तर हवंच!

दिवसभर ते दही वेगवेगळ्या form मध्ये अनुभवायचं!
कधी साखर घालून, तर कधी मीठ,
कधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत,
तर कधी कोणत्या ग्रेव्हीत!
कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून!
मला ना, ह्या ताकाचा… हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.

अर्थात, कुठचाही अतिरेक झाला तर आयुष्य पांचटच होतं!
हरेक दिवसाच्या recipe ची नजाकत वाढवता आली पाहिजे.

मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा पूर्ण दही संपवायच्या आधी,
रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं!
‘उद्याचं’ दही लावायला!

मग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,
परत नव्यानं दही विरजायचं.

मला ठाऊक आहे… रोज ही भट्टी जमेलच असं नाही.
पण नासलंच समजा कधी, कडवट झालंच समजा कधी,
तर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.

मग त्याकरता दुसर्‍याकडून विरजण मागायची वेळ आली …
तरी त्यात कमीपणा नसतो.

पण ‘दही’ मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं!
आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं!!!

धन्यवाद!
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

3 thoughts on “आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.